इचलकरंजी- शहरातील कचरा उठावाचे 22 कोटीचे टेंडर वादात सापडले असतानाच आता पुन्हा नव्याने रस्ते दुरुस्तीसाठी 23 कोटी रुपयाचा नवीन प्रकल्प सत्ताधारी आखत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकाकडून होत असल्याने त्या प्रश्नावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेला महिना इचलकरंजी शहरात 22 कोटी रुपयांच्या टेंडरचा गाजला यावरून सत्ताधारी भाजपातच दोन गट पडले, एका गटाचा सदर कामाला विरोध होता. यामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले हा वाद विकोपाला गेल्याने मुख्यमंत्री पातळीवर वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. सत्ताधारी गटातीलच नगरसेवकांकडून विरोध होऊ लागल्याने नेते मंडळीची चांगली डोकेदुखी वाढली. त्याचा परिणाम विकास कामावर होऊ लागला. यातच भरीत भर म्हणून आता नव्याने शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्ता सिमेंटीकरण करण्यासाठी 23 कोटी रुपयाचे शासनाकडून अनुदान आणण्याचा विचार महापौर यांनी सुरू केला याची सर्व इस्टिमेट तयार करण्याचे काम सुरू झाले.
याची कुणकुण विरोधी पक्षाला लागली व त्यांनी शहरातील एकमेव सुस्थितीत असणारा रस्ता नव्याने करण्याची काही गरज नाही. शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत असा आरोप करीत सत्ताधारी केवळ पैशाची उधळपट्टी करतात असा आरोप सुरू केला. याला लागलीच महापौर यांनी उत्तर देताना विरोधकांना विकास नको आहे, ते खोडा घालण्याचे काम करतात असा प्रति टोला लगावला. या वादात आणखीन भाजपातील एका गटाने अद्याप तरी उडी घेतलेली नाही.